Monday, 29 May 2017

अभिजात महाराष्ट्र...२०१४

पहिला अभिजात महाराष्ट्रचा कार्यक्रम २०१४ मधे झाला.खरंतर दोन-चार वर्षापासूनंच कल्पना मनात घोळत होती.पण धाडस होत नव्हतं.अशा कार्यक्रमांच्या नियोजनाचा अनुभव नव्हता.पैशाचं बळ नव्हतं.स्पॉन्सरर्स नव्हते.कुठले कलाकार बोलवावेत कळत नव्हतं.लाखों रुपये देऊन मोठे कलाकार कसेही मिळतात आणि त्यांना ऐकायला लोकही धडपडत येतात.तिकीटं लावावीत का फ्री करावा कार्यक्रम..एक ना अनेक प्रश्न होते.तरी पण हिंमत केली आणि निवडणुकांच्या धामधुमीत,ऊन्हाळ्याच्या काहिलीत अगदी दहा दिवसात कार्यक्रम ठरला.माझ्या एका मित्राच्या मदतीने कलाकार ठरवले आणि कामाला लागलो.
नाव शोधण्यापासून तयारी होती.संस्कृत,मराठी,उर्दु शब्दकोष धुंडाळले.अर्थपूर्ण नाव निवडलं.निमंत्रणं छापली.ओळखी काढून जाणकारांना आमंत्रण केली.
आमच्या हिरण्य फाऊंडेशनची भुमिका आणि सुत्र संचालन मीच करणार होते म्हणून मग त्याच सुत्रबध्द लिखाण,रट्टा...
किती लोकं येतील याचा अंदाजच नव्हता.नाही म्हणलं तरी हिरण्य शहरापासून सोळा किमि दूर आहे.संगीत रसिकांसाठी जरा आटोक्या बाहेरच पडतं.इतक्या दूर येणा-यांना काही रिफ्रेशमेंटस् देणं आम्हाला शोभून होतं.मग त्याचं अंदाजपंचे नियोजन.
स्टेज,लाईटस्,म्युझिक सिस्टिम्स,जाहिराती,प्रेस कॉन्फरन्स,
फोटो...
एका चार तासाच्या कार्यक्रमासाठी भरपूर तयारी करावी लागली तीही काटकसरीत आणि अंदाजानेच.
प्रचंड धाकधूक होती मनात.एवढं करुनही श्रोते आले नाही तर ? कारण आम्हाला हिरण्य हुरडा फेस्टमुळे गर्दी पहायची फार सवय. दडपणंच आलं.पण ते म्हणतात नं उखळात डोकं घातलं की काही घाव असे काही तसे.
शेवटी एकदाचा १ मे उजाडला आणि अतिशय प्रसन्न अशा सायंकालीन माहौलमधे पं अतुलकुमार उपाध्याय आणि पं मुकेश जाधव यांची व्हायोलीन आणि तबल्याची जुगलबंदी मस्त रंगली.
जवळपास तीनशे लोकांनी कार्यक्रमाची आणि स्तुत्य उपक्रमाची वाहवा केली.हिरण्यच्या निसर्गरम्य वातावरणात कलावंतांनाही स्फुरण चढलं. एकूणच उत्तर संध्याकाळ मंतरलेली वाटली.डोंगरांच्या,तलावाच्या कुशीतलं हिरण्य तबल्याच्या बोलांनी आणि व्हायोलिनच्या सुरावटींनी मंत्रमुग्ध झालं.
एक फार दिवसांच स्वप्न आणि दोन आठवड्याच्या तडतडीची सांगता पॉझिटिव्ह नोटवर झाली.

No comments:

Post a Comment