जगरहाटीतल्या संस्कृतीला त्या त्या भौगोलिक प्रदेशाचं, तिथल्या मोसमांचं, तिथल्या समाजाचं आणि काही प्रमाणात ऐतिहासिक परिस्थितीचं पाणी मिळाल्याशिवाय ती संस्कृती बहरतच नाही. अर्थात काळानुरूप त्यातही बदल होतात. तरीसुद्धा विचार केला तर बदललेल्या रुपाची पाळंमुळं आपल्याला खोलवर सापडतात.
हे लिहायचं कारण आत्ताच एका विशिष्ट आवाजात हरमा...ल, हरमा...ल असं ओरडत एक हातगाडीवाला दारावरुन गेला. खरंतर अशा गाडीवरचा प्लास्टिक आणि पत्री फुटकळ माल विकत घेतल्या जायची शक्यता आमच्या गल्लीत मुळीच नाही. पण जवळच कष्टक-यांची वस्ती आहे, त्या गल्ल्यांमधून फिरताना इथुनही एक फेरफटका तो विक्रेता मारत असेल. खूप वेगळी साद आली म्हणून मी जरा चौकसपणे पाहिलं तर हा गाळण्या, चाळण्या, कंगवे, आरसे असलं फुटकळ गोष्टी हातगाडीवर विकणारा होता.
दोन आठवड्यांपूर्वी अशीच एक महिला पातळ स्टिलची अतिशय वैविध्यपूर्ण आकारातली भांडी घेऊन फिरत होती. भांड्यांचे आकार एकदम दक्षिणी टाईप म्हणजे आंध्रा पध्दतीचे. पहाता क्षणीच नजरेत भरावे असे. भांड्यांच्या आकाराच्या मोहात पडून लगेच तिला थांबवून माझ्या दारी ये असं म्हटलं तर बाल है क्या दिदी ? बाल पे ही ते बर्तन मिलेंगे असं म्हणून तिने मला वाटेला लावलं. या वसाहतीत अजूनही केसांच गुंतवळ विकत घेऊन त्या बदल्यात गंगावन किंवा अशी कमनिय आकारातली स्टिलची भांडी विकणारे फिरताहेत हेच नवल आहे.
सहसा तुडुंब पावसाळा असतांना असे फिरते विक्रेते फार कमी दिसतात. पण गणरायाचं आगमन आणि अशा फिरस्त्या विक्रेत्यांचा एक विशिष्ट वर्ग दारोदार फिरुन नेमक्या वस्तू विकायच्या मागे लागतो.
आम्ही रहातो तो ब-यापैकी मॉडर्न व सधन आणि हिंदूचं प्राबल्य असलेला एरिया आहे. पण गेल्या चाळीस वर्षात औरंगाबाद शहरात दिसले नाहीत असे हर त-हेचे विक्रेते इथे हजेरी लावून जात असलेले दिसले.
त्यात आपल्या सारख्या उष्ण कटिबंधातील भारतात, त्यातही आमच्या कोरडेठाण मराठवाड्यात तर हिवाळा म्हणजे अति सुखाचा मोसम. त्यामुळे दिवाळी संपली की या विक्रेत्यांच्या आरोळ्या दिवसभर ऐकायला येतात. बरेचदा या आरोळ्या इतक्या परिचित झालेल्या असतातना की कधी एखादी वेगळी आरोळी ऐकायला आली की लगेच कान टवकारतात आज हा काय विकतोय बरं म्हणून.
गालिचे विकणारे, कपड्यांवर-केसांवर स्टीलची भांडी देणारे, जुन्या कपड्यांच्या सतरंज्या करुन देणारे, सणावारी डेकोरेशन, रांगोळ्या, खोटी फुलं-हार, साचे विकणारे, झाडू-झाडं-कुंड्या विकणारे, लाह्या-मुरमुरे-पापड व इतर वाळवणं विकणारे, ऐन थंडीत डिंक, बदाम, चारोळ्या विकणारे, तिळ-जवस-कारळ-मोहरी विकणारे, भाज्या-फळं विकणारे, घरगुती तुप, मध विकणारे, धार लावणारे, गोधड्या शिवणा-या...काही विचारु नका. सतत कुणी ना कुणी हाकारे देऊनच जातात.
भर उन्हाळ्यात मुलांना फिरवणारे उंट आणि उंटवाले, बुढ्ढी के बाल, कुल्फीवाले, माठवाले,
ऐन श्रावण-दिवाळीत पोतराज, वासुदेव, रामदासी, भविष्यवाले, नंदीबैलवाले, कश्मिरी भरतकामी कपडे, कलकत्ता साड्या विकणारे...वगैरे वगैरे.
म्हणजे बसल्या जागी करमणूकच करुन घ्यायची असेल तर सहज दिवस कलंडू शकतो.
त्यातही गंमत म्हणजे आर्थिक स्तराप्रमाणे, विशिष्ट धर्मांच्या वसाहती प्रमाणे, त्या-त्या ठिकाणच्या हवामानाप्रमाणे देखील हे विक्रेते विविध वस्तू, पदार्थ घेऊन हाकारे देत फिरत असतात.
आपल्याच औरंगाबादमध्ये मुस्लिम एरियात ब्रेड, पाव, टोस्ट, खारी, अंडी दारोदार जाऊन विकणारे बहुसंख्येने असतात. तर हिंदू वसाहतींमध्ये सणावारी बेल-फुलपुड्या विकणारे प्रामुख्याने फिरतात.
माझी एक इराकी मैत्रिण सांगत होती की इराकमध्ये पोर्टेबल, मुव्हेबल तंदूर घेऊन लोकं गल्ल्यांमधून फिरतात. आपण आपलं भिजवलेलं पीठ दिलं की तिथल्या तिथे खरपूस तंदूर शेकून देतात. दिल्लीतही असे तंदूर-पराठे शेकून देणारे हातगाडीवाले फिरतात म्हणे. वेगवेगळ्या प्रांताचेही काही वैशिष्ट्यपूर्ण विक्रेते असतीलच की.
मागे पॉंडेचरीला गेले होते. वास्तव्य अगदी एका कोळी पाड्यात होतं. तिथे रोज सकाळी एका बकेटमधे ताजी मासळी विक्रीसाठी घेऊन एक बाई फिरायची. बकेटवर मासे कापायला लाकडी फळी, कोयता आणि वजन करायला छोटा तराजू. रोज ताजे मासे.
त्या मासेवालीच्याच मागे एकावर एक दोन डाली घेऊन एक फुल विक्रेती यायची. एकात मोगरा, दुसरीत अबोली. दो-यात गुंफलेल्या हारांच्या वेटोळ्यांनी त्या डाली अक्षरशः ओसंडून जात असायच्या.
अगदी सागर किनारी असलेला टुमदार पाडा, गल्लीतील प्रत्येक झोपडी वजा कौलारु घरासमोर रोज पहाटेच सडा, त्यावर दिन महात्म्याच्या सुरेख हळद-कुंकू वाहिलेल्या अप्रतिम रांगोळ्या, दारांना फुलांची तोरणं आणि गल्लोगल्ली हाळी देत आलेल्या या मासे आणि फूल विक्रेत्या..असं एक अतिशय चैतन्यदायी सुगंधी-दुर्गंधी दृश्य रोज सकाळी पहायला मिळायचं.
तर अशी ही गल्लोगल्ली, दारोदारी जाऊन काहीतरी विक्री करणारी जमात घरबसल्या आपल्याला नकळतपणे रिझवते. तुम्ही भलेही कुठल्याही निराशाजनक मूडमध्ये असाल पण या चुटपुट विक्रेत्यांचे हाकारे तुम्हाला खरोखर आश्वस्त करतात.
एक उमेद देतात.
ही अनदेखी पण आवाजी चहलपहलच तुम्हाला एक इंस्टंट उर्जा देते.
सगळं काही आलबेल आहे, होईल आणि असणारच याची ग्वाहीच देत असल्यासारखे हे अनाम फिरस्ते फरिश्ते गल्लोगल्ली चैतन्य वाटत फिरत असतात.